आमदार तानाजीराव सावंत यांनी दिलेला शब्द पाळला..!
तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना गती
जिल्हा परिषद सदस्य विकी चव्हाण व बालाजी आण्णा घोलप यांच्या पुढाकारातून विविध रस्त्यांची पाहणी
वाशी | प्रतिनिधी
“८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार आजही विकासकामांच्या माध्यमातून जपण्याचे काम माजी मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकासकामांना गती मिळत असून तेरखेडा जिल्हा परिषद गटात शेतरस्त्यांच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जात आहे. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आता प्रत्यक्षात पूर्ण होताना दिसत आहे.
मतांसाठी नव्हे, तर समाजकारणाच्या भूमिकेतून निवडणुकीपूर्वीही अनेक शेतरस्त्यांची कामे करण्यात आली होती. आता शासनाच्या माध्यमातून विविध रस्त्यांच्या कामांना अधिक वेग देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१५ मे) तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे सदस्य विकी चव्हाण व बालाजी आण्णा घोलप यांनी पुढाकार घेत तेरखेडा, खामकरवाडी, सटवाईवाडी, कडकनाथवाडी परिसरातील विविध रस्त्यांची पाहणी केली.
यामध्ये नॅशनल हायवे ५२ तेरखेडा ते वडजी रस्ता, सटवाईवाडी ते हेडसरी रस्ता, सटवाईवाडी ते बसवेश्वर मंदिर शिवार रस्ता, माणिकदंड रस्ता ते सटवाईवाडी रस्ता तसेच खामकरवाडी ते उंबरगा रस्त्याचा समावेश आहे. तसेच गोळे शिवार, उकरंडे शिवार, घोलप शिवार व हलकरे शिवारातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचीही पाहणी करण्यात आली. संबंधित कामांना लवकर गती देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी तहसीलदार प्रकाश मेहत्रे, बालाजी हलकरे, कृष्णा माळी, रामलिंग शिंदे, स्वप्निल पोळ, समाधान घोलप, रोहित घोलप यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















Total views : 12301