धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे लाडके आमदार आ. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मतदारसंघात “गाव भेट दौरा अभियान” उत्साहात सुरू करण्यात आले आहे. सामनगाव आणि वालवड येथून या अभियानाची प्रभावी सुरुवात करण्यात आली.
या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांच्या प्रमुख समस्या प्रत्यक्ष जाणून घेणे, त्या प्रशासन व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे, ही जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली आहे. “विकास हेच व्हिजन” समोर ठेवून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
गाव भेट दौऱ्यादरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेती, आरोग्य, शिक्षण तसेच शासकीय योजनांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. लोकप्रतिनिधी स्वतः गावात येऊन समस्या जाणून घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या अभियानाबाबत माहिती देताना बाजार समिती संचालक श्री. विशाल ढगे यांनी सांगितले की, आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार हे अभियान संपूर्ण मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
यावेळी जि.प. सदस्य बालाजी काळे, पंचायत समिती सदस्य शंकर सुबुगडे, माजी सभापती निलेश शेळवणे, कृषी अधिकारी किशोर अंधारे, सरपंच विशाल अंधारे, समाधान सातव, युवराज तांबे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Total views : 12318