सत्ता विरुद्ध जनतेची लढाई; विधान परिषदेत महाविकास आघाडीचा विजय निश्चित : महेश देशमुख
धाराशिव : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणूक 2026 ही केवळ उमेदवारांमधील निवडणूक नसून सत्ताधारी व्यवस्थेविरोधात जनतेच्या भावना व्यक्त करणारी लढाई आहे. मजूर, शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीला 600 हून अधिक मते मिळतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी व्यक्त केला.
धाराशिव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, खलील सय्यद, राजेंद्र शेरखाने, सरफराज काझी, मिनिल काकडे, महेबुब पटेल, गणेश पवार, संकेत पडवळ, अग्निवेश शिंदे, शेखर घोडके, रोहित बागल, अभिजीत बागल, शिवाजी गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, राज्यातील सध्याच्या सरकारबाबत लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. वाढती महागाई, रोजगाराच्या संधींचा अभाव, शिक्षण क्षेत्रातील अनिश्चितता, युवकांच्या भवितव्याशी खेळणारे निर्णय आणि महिला सुरक्षेचे गंभीर प्रश्न यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शेतकरी, मजूर आणि कष्टकरी वर्गाला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
ते पुढे म्हणाले की, नीटसारख्या स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणारे घोळ, पारदर्शकतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेली तडजोड यामुळे तरुण पिढीमध्ये असंतोष वाढत आहे. शासनाची नीतिमत्ता आणि निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेचा विश्वास ढासळत चालला आहे. अशा परिस्थितीत ही निवडणूक जनभावनांची दिशा ठरवणारी ठरणार आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व मतदार घटकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण असून विजयासाठी आवश्यक असलेल्या ‘मॅजिक फिगर’पेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राजकारण अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि जनहितवादी व्हावे, हीच महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे सांगताना देशमुख यांनी सत्तेचा वापर जनतेच्या कल्याणासाठी व्हावा, अन्यथा मतदार त्याला योग्य उत्तर देतील, असे स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीच्या कारभारावर जोरदार टीका करत जनतेच्या प्रश्नांवर आधारित राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला. आगामी काळात मतदारांचा कौल परिवर्तनाच्या बाजूनेच राहील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.


















Total views : 14321