‘कव्हरेज क्षेत्राबाहेर’चा बहाणा; शालिमार कॉलनीत वीजप्रश्न चिघळला, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
लाईनमन संपर्कात नाहीत; जबाबदार अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा, नागरिकांचा इशारा
प्रतिनिधी : शालिमार परिसर
शालिमार कॉलनीमध्ये वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज खंडित झाल्यानंतर संबंधित लाईनमनला फोन केला असता वारंवार ‘कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर’ असा प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, समस्या तातडीची असतानाही कोणीही जबाबदारी स्वीकारत नाही. “जे करू शकतो, ते बाहेर येत आहे,” अशा प्रकारची उत्तरे देत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात नागरिकांना अंधारात व त्रासदायक परिस्थितीत राहावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच कार्यक्षम व जबाबदार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी परिसरातून होत आहे.
दरम्यान, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व शाखा अभियंता यांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन ठोस पावले उचलणार का, की ‘कव्हरेज क्षेत्राबाहेर’चाच बहाणा कायम राहणार, हा प्रश्न शालिमार परिसरातील नागरिकांना पडला आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12313