पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी
शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी ठरणार जीवनदायी मार्ग
भूम / धाराशिव (वार्ताहर) – पार्डी फाट्यापासून भूम, वालवड, आनाळा, गोंदा, हिंगणगाव, देऊळगाव, गोसाईवाडी, आलेश्वर, करंजे, करमाळा, राशिन मार्गे भिगवणपर्यंत प्रस्तावित चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. हा महामार्ग शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णांसाठी भविष्यात वरदान ठरणार असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर महामार्गाला “भाई उद्धवराव पाटील महामार्ग” असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी पुढे येत आहे. या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप नेते सुजित ठाकूर, माजी आमदार राहुल मोटे, विद्यमान आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी मान्यवरांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र अद्याप या प्रकल्पास अपेक्षित गती मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हा महामार्ग धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांमधील संपर्क अधिक वेगवान होणार आहे.
या महामार्गामुळे कृषी माल वाहतूक, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार, उद्योग व्यवसाय आणि दळणवळण यामध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवेसाठी मोठा फायदा होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे “कामाचा सातत्याने पाठपुरावा झाला पाहिजे, मी तातडीने निधी मंजूर करतो” हे ब्रीदवाक्य प्रसिद्ध असून, धाराशिव व परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे या महामार्गासाठी अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा चार लेन महामार्ग लवकरात लवकर मंजूर होऊन प्रत्यक्षात यावा, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.





















Total views : 12798