विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश
भूम | प्रतिनिधी
राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून जनतेच्या प्रश्नांचे निराकरण आणि विकासाच्या वाटचालीला गती देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व असल्याचा संदेश देणारी महत्त्वपूर्ण आढावा बैठक भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत आगामी राजकीय रणनीती, विकासकामे, दुष्काळी परिस्थितीची पूर्वतयारी आणि संघटनात्मक बळकटी यावर सखोल चर्चा करण्यात आली.
मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सभापती तसेच विविध पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत प्रत्येक गावाच्या विकासाचा बारकाईने आढावा घेण्यात आला. शिवसेनेची विचारधारा आणि पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य संकटांवरही बैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेती, पेरणी, पशुधन आणि पाणी व्यवस्थापनाबाबत व्यापक नियोजन करण्यात आले. गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा, चारा छावण्यांची उभारणी आणि शेतकरी हिताचे सर्व उपाय तत्काळ राबविण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद गटनिहाय आणि पंचायत समिती गणनिहाय सुरू असलेल्या विकासकामांची माहिती घेण्यात आली. रखडलेल्या कामांना गती देण्यासोबतच ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरही चर्चा झाली. अनेक भागांत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या वीजपुरवठ्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महावितरण अधिकाऱ्यांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बैठकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिवसेना गटनेते संदेश (विकी) चव्हाण आणि जिल्हा परिषद सदस्य सुनील उंदरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि संघटनात्मक एकजूट निर्माण करणारा हा क्षण ठरला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, परंडा नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर, भूमचे माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे, भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हाईस चेअरमन केशव सावंत, रामचंद्र घोगरे सर यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीतून विकास, संघटन आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली. मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी अविरतपणे कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
— दैनिक त्रिशक्ती
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 14002