खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डे
कळम प्रतिनिधी
प्रशासनातील जबाबदारी ही केवळ कार्यालयापुरती मर्यादित नसून ती समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून सिद्ध होते, याचा प्रत्यय कळंब शहरात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे चुकवताना अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र या समस्येकडे केवळ पाहत न बसता कळंबचे पोलीस निरीक्षक श्री. शेख यांनी तातडीने पुढाकार घेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशंसनीय पाऊल उचलले.
शहरातील प्रमुख मार्गावर निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती लक्षात येताच नगर परिषदेकडून कारवाईची वाट न पाहता पोलीस निरीक्षक शेख यांनी स्वतः पुढाकार घेत खाजगी मिक्सर मशीनची व्यवस्था केली. रात्री वाहतुकीची गर्दी कमी झाल्यानंतर सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी जीवघेणे खड्डे बुजवून घेतले.
सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे संभाव्य अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात टळला आहे. अनेक वाहनधारकांनी या कृतीचे स्वागत करत पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले. एखादी समस्या कोणाची जबाबदारी आहे यावर चर्चा करण्यापेक्षा ती सोडविण्यासाठी पुढे येणे अधिक महत्त्वाचे असते, याचा आदर्शच या कृतीतून दिसून आला.
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी जाणून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करणारे अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. पोलीस निरीक्षक शेख यांनी दाखवून दिलेली ही सामाजिक संवेदनशीलता आणि लोकहिताची भूमिका ही केवळ कर्तव्यपूर्ती नसून जनतेप्रती असलेली खरी बांधिलकी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सध्या समाजात टीका करणारे अनेकजण दिसतात; मात्र समस्या स्वतःची समजून त्यावर उपाय करणारे हात फार कमी असतात. कळंबमध्ये घडलेली ही घटना अशाच सकारात्मक आणि लोकहितवादी प्रशासनाची जिवंत उदाहरण ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केलेल्या या कार्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री. शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या या उपक्रमाची शहरभर चर्चा रंगली आहे.
— दैनिक त्रिशक्ती




















Total views : 14002