“पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाची खासगावातून दमदार सुरुवात
गावकऱ्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना
परंडा तालुक्यातील खासगाव येथे “पंचायत समिती आपल्या दारी” या लोकाभिमुख उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या समस्या गावात जाऊन जाणून घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे विकासरत्न आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, रामचंद्र घोगरे सर, तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, उपसभापती परसू गवारे, गटनेते अमोल नलवडे तसेच मागासवर्गीय विभागाचे तालुकाप्रमुख गुलाबराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांच्यासह पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घेत गावातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, अशा स्पष्ट सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
कार्यक्रमात बोलताना पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा मांडला. खासगावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी स्वखर्चातून बोअरवेल व मोटारची व्यवस्था करून गावकऱ्यांना दिलासा दिल्याचा उल्लेख यावेळी विशेष कौतुकाने करण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे यांनी नागरिकांनी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.






















Total views : 12315