धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून रस्सीखेच !!
➡️ तानाजी सावंतांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष..!!
धाराशिव, प्रतिनिधी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून धाराशिवमध्ये सध्या राजकीय रस्सीखेच शिगेला पोहोचली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांनी आपापली ताकद लावली असून अंतिम निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेषत: तानाजी सावंत कोणती भूमिका घेणार, यावरच सध्याचे सत्तासमीकरण ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यापूर्वी झालेल्या जाहीर सभेत सावंत यांनी ठाम शब्दांत “जिल्हा परिषदवर भगवा फडकणार आणि अध्यक्षपद शिवसेनेकडेच राहणार,” असा निर्धार व्यक्त केला होता. त्या विधानानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सावंत कोणती रणनीती आखतात, याकडे विरोधकांसह कार्यकर्त्यांचेही बारकाईने लक्ष लागले आहे.
दरम्यान, विरोधकांनीही अंतर्गत बैठका सुरू केल्या असून ‘क्रॉस व्होटिंग’ टाळण्यासाठी खबरदारी घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे प्रत्येक मताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची लढत ‘प्रतिष्ठेची’ बनली आहे. सावंत यांच्या एका निर्णयामुळे सत्तेचे पारडे झुकू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्हीही वाढले आहेत.
राजकीय भूकंप घडवू शकणारा निर्णय?
सावंत यांच्या पुढील पावलावरच जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या बाजूने जाईल, हे स्पष्ट होणार आहे. त्यांच्या भूमिकेमुळे विरोधकांच्या हृदयाचे ठोके वाढले असल्याचे चित्र आहे. आता अधिकृत घोषणा कधी आणि काय होते, याकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



















Total views : 5932