विश्वास आणि पारदर्शकतेचा गौरव: जनहित पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) –
येरमाळा येथील जनहित पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘दिपस्तंभ’ पुरस्कार यंदा प्रदान करण्यात आला. सलग पाचव्या वर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवून संस्थेने येरमाळा व पंचक्रोशीच्या सहकार क्षेत्रात आपला लौकिक अधोरेखित केला आहे.
गेल्या २२ वर्षांपासून जनहित पतसंस्था येरमाळा व परिसरात बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून स्थापनेपासून आजपर्यंत संस्था सातत्याने नफ्यात आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ असून आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सभासदांचा वाढता विश्वास ही संस्थेची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
१० कोटी ते ५० कोटी गटातून छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक मिळवत संस्थेने हा बहुमान पटकावला. हा पुरस्कार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयजी जोशी, फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. वासुदेव काळे, सीईओ सुरेखाताई लावंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक प्रा. संतोष तौर, छत्रपती संभाजीनगरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बीडवे, वल्लभ माशाळकर, दत्तात्रय रणसिंग व नितीन कवडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार वितरण सोहळा दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथील आर्यन रिव्हरऊड रिसोर्ट येथे उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे व्यवस्थापक शिवप्रसाद घेवारे यांनी सांगितले की, संचालक मंडळ, सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या विश्वासामुळेच हा सन्मान मिळाला असून याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार मानले आहेत.



















Total views : 5932