उपसरपंच गोविंद बर्गे नंतर धाराशिव जिल्ह्यातील आणखी एक तरुणाची कला केंद्रातील नर्तकी मुळे आत्महत्या.
येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे) –
कळंब तालुक्यातील चोराखळी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आळणी फाटा साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून आणि त्यानंतर झालेल्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, येरमाळा पोलीसांनी महिलेवर गुन्हा नोंद करुन ताब्यात घेतले आहे.
येरमाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अश्रुबा अंकुश कांबळे हा रुई (ढोकी) ता. धाराशिव येथील रहिवासी होता. त्याचे आणि आळणी फाटा येथील साई कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या एका लातूर येथील रहिवासी महिलेचे गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
सोमवारी (ता. ८) ते दोघेही शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून परत येत असताना प्रवासात अश्रुबा याला त्याच्या पत्नीचा फोन आला. पत्नीचा फोन आल्यानंतर अश्रुबा आणि त्याच्यासोबत असलेल्या प्रेयसीमध्ये कडाक्याचा वाद झाला.या वादातून रागाच्या भरात अश्रुबाने आत्महत्या करण्याची धमकी दिली. मात्र, प्रेयसीने या धमकीकडे दुर्लक्ष केले.त्यानंतर टोकाचे पाऊल उचलत अश्रुबा याने चोराखळीच्या वनिकारनातील जंगलात एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार कांही शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.९) पहाटे उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खुर्द मसला या गावचे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राची,आरोपी नर्तिका पुजा गायकवाड प्रकारानंतर चोराखळी,आळणी फाट्यावरील पाच कलाकेंद्र जिल्हा पोलिस अधिक्षक,आणि जिल्हा अधिकारी यांनी बंद केल्या नंतर कला केंद्राच्या नर्तकीमुळे आणखी एकाने आत्महत्या केल्याने परिसरात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात पुजा वाघमारे (रा.लातूर ) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन संबंधित महिलेविरुद्ध आत्म हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी (कलम ३०६ अन्वये) गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनैतिक संबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या कौटुंबिक कलहाचा हा आणखी एक बळी ठरल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.





















Total views : 4449