धाराशिव | प्रतिनिधी
द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती महोत्सव समिती स्थापन
अध्यक्षपदी पृथ्वीराज चिलवंत यांची सर्वानुमते निवड
सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी धाराशिव येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती (२०२६–२०२७) स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वर्षभर शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष: रविकांत गोरे
स्वागताध्यक्ष: दत्ता गोरे माळी
कोषाध्यक्ष: सौदागर गोरे माळी
सचिव: अमर माळी
कार्याध्यक्ष: बळीराम माळी
मिरवणूक प्रमुख: स्वराज जानराव, प्रवीण वाघमारे, सचिन दिलपाक
मार्गदर्शक व सल्लागार समिती: महादेव माळी, संजय माळी, गोविंद गोरे, राजाभाऊ माळी, चंद्रशेखर सुरवसे, चंद्रकांत गोरे, पांडुरंग माळी यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीमार्फत वर्षभर महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे प्रदर्शन, त्यांच्या विचारांवरील पुस्तकांचे वाटप, तसेच पारंपरिक वाद्यांसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विशेष शिबिरे आयोजित करून जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांची प्रमाणपत्रे मोफत काढून देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याशिवाय विविध क्रीडा स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.
या वर्षभरातील कार्यक्रमांची आठवण म्हणून साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे महात्मा फुले यांच्यावरील लेख असलेला “क्रांतिसूर्य” विशेष अंक प्रकाशित करण्यात येणार आहे.
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीला ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी या जयंती महोत्सवात सहभागी होऊन अनमोल योगदान द्यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत यांनी केले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 6917